spot_img

विकसित भारत संकल्प यात्रेचा अंजनगाव बारी येथून मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ

विकसित भारत संकल्प यात्रेचा अंजनगाव बारी येथून मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ;प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे लाईव्ह प्रक्षेपण

■ मिररवृत्त
■ अमरावती

केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम दि. 26 जानेवारीपर्यंत राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शासनाच्या योजनाची माहिती देणारे प्रसिद्धीरथाचे अंजनगाव बारी ग्रामपंचायत येथून खासदार डॉ. अनिल बोंडे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या उपस्थितीत आज शुभारंभ झाला. ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ कार्यक्रमांतर्गत दुरदृष्य प्रणालीव्दारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे यावेळी लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी अंजनगाव बारी येथील ग्रामस्थांचा या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला दि. 23 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व तालुकास्तरावर प्रारंभ झाला आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ हा कार्यक्रमांतर्गत अंजनगाव बारी येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. सरपंच श्रीमती शोभाताई खडसे, उपसरपंच जगदीश अंबाळकर, ग्रामसेवक विनोद इसाळ तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे प्रमुख बाळासाहेब बायस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, गटविकास अधिकारी प्रफुल्ल बोरकांडे, तहसीलदार विजय लोखंडे तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, केंद्र शासनाच्या फ्लॅगशीप योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असून त्यामुळे लाभार्थ्यांचा सामाजिक व आर्थिकस्तर उंचावत आहे. केंद्र शासनाच्या घरकुल योजनामुळे गरीबांना पक्के घर मिळाले असून त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावत आहे. तसेच आयुष्मान भारत योजनामुळे गरजूवर पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार केले जात आहेत. यामुळे गरीबांच्या आजारावरील होणारा खर्चाची बचत होवून त्यांना आर्थिक सहाय्य होत आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनामुळे समाजातील प्रत्येक घटकांचा विकास होत असून लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित देश म्हणून भारत देश नावलौकिक मिळवेल. विकसीत भारत संकल्पपूर्तीसाठी सर्व शासकीय यंत्रणानी शेवटच्या घटकापर्यंत योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा म्हणाले की, यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार असून, अद्यापपर्यंत ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या 17 महत्त्वाकांक्षी योजनांची सविस्तर माहिती असलेले चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील ग्राम व तालुकास्तरावर व्यापक प्रचार-प्रसिद्धी केली जाणार आहेत. तसेच नागरिकांकडून निवेदनही स्वीकारले जात आहे. या प्रचाररथाच्या माध्यमातून नागरिकांनी केंद्र शासनाच्या विविध योजना लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अंजनगाव बारी येथील रहिवासी फातिमा सलीम यांनी विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत त्यांना प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना अशा विविध योजनांच्या झालेल्या लाभाबाबत माहिती दिली. त्यानंतर लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आयुष्मान भारत गोल्ड कार्ड व जलजीवन मिशनचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणीसह विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. नागरिकांनी या स्टॉल्सला भेटी देऊन आरोग्य तपासणीसह विविध योजनांचा लाभ घेतला. मा.पंतप्रधान यांचा विकसित भारत बनविण्याचा संकल्प संदेश सर्वांना यावेळी ऐकविण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी संकल्प शपथ घेतली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे केंद्र शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनांच्या लाभाविषयी अनुभव जाणून घेतले. योजनाची माहिती इतर वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन प्रधानमंत्री यांनी यावेळी केले. फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण देशात प्रचार व प्रसिद्धी करीत आहे. या यात्रेच्या माध्यमातून वंचित घटकांनी शासनाच्या योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!